Tuesday, October 4, 2011

वसंत दत्तात्रेय गुर्जरांची कविता

- प्रकाश देशपांडे केजकर

वर्तमानाची जुलूम-जबरदस्ती हे गुर्जरांच्या कवितेचे मध्यवर्ती विषयसूत्र आहे.

सामान्य माणसांच्या हालअपेष्टांना मध्यवर्ती ठेवून विव्हळ होणाऱ्या गुर्जरांच्या कवितेमागे एक असहाय अशी सार्वजनिकता आहे. त्यांच्या कवितेतील पात्रांना आपल्या वैयक्तिक दुःखाबरोबर एका सार्वजनिक दुःखाने पछाडलेले दिसते. सर्वांना मिळून भोगावयाचे असे हे दुःख आहे. एका निरस अशा नित्याच्या जीवनक्रमाने त्यांना एकमेकांशी जखडून ठेवले आहे. त्यातून त्यांना मुक्तता नाही. एकमेकांचे एकमेकांवर लादलेले सान्निध्य हाच त्यांचा दिलासा आहे.

सामान्य माणसाच्या दुःखाला आणि दैन्याला मध्यवर्ती समजून गुर्जर मानवी जीवनाचा आणि ओघानेच महानगरी जीवनाचा ताळेबंद मांडतात. त्यात जमेची बाजू नगण्य आहे. महानगरी जीवनाची काळी बाजूच या सामान्य माणसांच्या वाट्याला आली आहे. पराक्रम आणि पुरुषार्थ यांचे सगळे संदर्भ गमावून या महानगरात अत्यंत क्षुल्लक असे आयुष्य जगणे त्यांच्या निशिबी आले आहे. वाट्यास आलेले हे यःकश्चित जीवन त्यांना कधीही अर्थपूर्ण वाटले नाही. माणसाच्या क्षुल्लकपणाचे एवढे यथार्थ चित्रण मराठी कवितेत दुर्मिळ वाटावे असेच आहे. गुर्जरांच्या कवितेतील पात्रे, त्यात कवी आलाच, महत्त्वाकांक्षी तर नाहीतच, पण नाकत्वाची एकूण संकल्पनाच त्यांच्या बाबतीत अप्रस्तुत ठरावी इतके त्यांच्या पुरुषत्वाचे खच्चीकरण झाले आहे. थिजलेल्या त्यांच्या जीवनात ज्याची आवर्जून नोंद घ्यावी असे चलनवलन नाही. त्यांच्या गतिशून्य जीवनात कसलीही नवलाई नाही. अनवधानानेच त्यांना मनुष्ययोनीत वर्ग करण्यात आले आहे असे वाटते. जुलूम सहन करण्याची त्यांची क्षमता केवळ पशुतुल्य आहे. उगाचच जन्माला येऊन उगाचच जगणाऱ्या बापुड्यांचे हे जग आहे. सामान्य माणसाच्या या गलितगात्र अवस्थेची अनेक रूपे चित्रित करण्यात गुर्जरांच्या कवितेची महती आहे.

(एका पुस्तकातील मोठ्या लेखातील थोडासा भाग)

No comments:

Post a Comment